शालार्थ आयडी घोटाळा : छत्रपती संभाजीनगर बोर्डाच्या सचिव वैशाली जामदार यांना अटक
राज्याच्या शिक्षण विभागात प्रचंड खळबळ उडवणाऱ्या ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्याच्या तपासात मोठे गौप्यस्फोट होत आहेत. छत्रपती संभाजीनगर विभागीय मंडळाच्या सचिव आणि नागपूरच्या माजी उपसंचालक वैशाली जामदार यांना शुक्रवारी अटक करण्यात आली. विशेष न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून, त्यांच्यावर 211 बनावट शालार्थ आयडी तयार केल्याचा गंभीर आरोप आहे.
या प्रकरणात वैशाली जामदार या अटक झालेल्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. याआधी गुरुवारी नागपूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष चिंतामण वंजारी यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये या बनावट शालार्थ आयडींचा वापर झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
लक्ष्मण मंघामची कबुली – घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार
या घोटाळ्याचा उगम लक्ष्मण उपासराव मंघामकडून झाला. तो शिक्षण उपसंचालक कार्यालयात लिपिक म्हणून कार्यरत होता. २०१९ पासूनच तो शालार्थ प्रणालीमध्ये बनावट आयडी तयार करत होता. या कामासाठी त्याने कार्यालयाबाहेरील संगणकांचा वापर केला. पोलिसांनी तीन दिवसांपूर्वी त्याला अटक केली असून, चौकशीत त्याने अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे उघड केली.
राज्यभरात खळबळ – अधिकाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण
शिक्षक भरतीप्रक्रियेत झालेल्या या घोटाळ्यामुळे संपूर्ण राज्यातील शिक्षण विभाग हादरला आहे. आतापर्यंत आठहून अधिक अधिकारी आणि एक शिक्षक अटकेत असून, चौकशी सुरू आहे. वैशाली जामदार आणि चिंतामण वंजारी यांची अटक ही तपासातील एक मोठी कामगिरी मानली जात आहे.
पुढील पावले काय?
वैशाली जामदार यांना नागपुरात आणून पुढील चौकशी केली जाणार आहे. चिंतामण वंजारी यांना २७ मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे. या प्रकरणात आणखी काही मोठी नावे पुढे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शिक्षण विभागातील प्रामाणिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा हा घोटाळा लवकरात लवकर उघडकीस आणण्याची मागणी राज्यभरातून होत आहे.
If you have any query regrading Site, Advertisement and any other issue, please feel free to contact at schooledutech.com@gmail.com